अर्धवट राहिलेला लक्ष्या.. .

 



खरंतर नव्वदीच्या आधीपासून सर्वांची टीव्ही पाहण्याची सुरुवात ही लक्ष्या आणि अशोक मामा पासूनच होते, आज अशोकमामा ना पाहिलं की लक्ष्याची आठवण झाली नाही असं होणार नाही,

आज जर लक्ष्मीकांत असते तर त्यांचाही चेहरा अशोक मामा सारखा फुगीर झाला असता, त्यांच्याही चेहऱ्यावर बारीक दिसणारे सुरकुते दिसले असते, त्यांचेही डोळे वयोमानाने खंगले असते, जसे अशोक मामाचे केस पिकलेत, तसेच लक्ष्मीकांत यांचेही केस पिकले असते,

खरंतर त्यांना कोणी लक्ष्मीकांत म्हणतच नसत, कारण, त्यांच्या प्रत्येक सिनेमांमध्ये ते नेहमी ''लक्ष्या" च असायचे, जो मरताक्षणीच सर्वांचा लाडका "लक्ष्मीकांत बेर्डे" होऊन गेला,


लहानपणी बाटलीतला गंगाराम पाहिला होता, लाल रंग पाहून अंगातली पावर गायब होऊन गुंडांचा मार खाणारा लक्ष्या पाहिला होता, तात्या विंचू जेव्हा लक्ष्याच्या छाताडावर बसून 'ओम क्लिंम क्लिंम ओम भट्ट स्वाहा.. ' म्हणतो तेव्हा घामेघुम सैरावैरा झालेला लक्ष्यासुध्दा एक बोलका बाहुलाच वाटायचा, आज जर लक्ष्मीकांत असते तर कदाचित झपाटलेलाचे सुध्दा गोलमाल हॅरी पॉटर सारखे पार्टवर पार्ट निघाले असते, धडाकेबाज गंगाराम पुन्हा एकदा बाटलीतुन बाहेर आला असता, कदाचित आणखी एखादी दुसरी पॉवर घेऊन पुन्हा एकदा लक्ष्याने दे दना दन केले असते, अशोक मामालाही पुन्हा एकदा लक्ष्यासोबत व्यख्या विख्खी.. . करताना पाहिला असता, माझा सोनूला छकुला आज मोठा झाला असता, तात्या विंचूला कोणतातरी दुसरा मंत्र मिळाला असता, आज जर लक्ष्मीकांत असते तर खरंच पुन्हा एकदा धांगडधिंगा घातला असता,

आजही जेव्हा जेव्हा हनुमान मंदिरात जातो तेव्हा तेव्हा लक्ष्याची आठवण येतेच येते, कारण, लक्ष्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये लक्ष्या हा हनुमानाचा सच्चा भक्त असायचा,

लक्ष्याची हिरोईन म्हणून आवडा अक्का ठरलेलीच असायची, आणि त्याची आई सुध्दा, लक्ष्याचा भाऊ म्हणून तर कधीकधी मित्र म्हणून महेशने (कोठारे) लक्ष्याच्या पाठीवर मारलेली थाप आजही तितकीच आधार देणारी अन जिव्हाळाची वाटते, जी कोणत्याही मैत्रीपुढे नेहमी आदर्श आहे, बहुधां त्यामुळेच आज महेश सरांचे सिनेमे पोरके झाले असावेत,

लक्ष्याला विसरणे शक्य नाहीये कधीच, कारण आम्हाला लहानाचे मोठे त्यांच्या सिनेमांनीच केले, लक्ष्या हा असाच आठवत राहील कधी बनवाबनवी मधून तर कधी हम आपके हैं कौन मधून.. .


By the way, मी आज लक्ष्याला पाहत नव्हतो, actually अशोक मामांचा नवा सिनेमा पाहत होतो, त्यावेळी सिनेमा पाहताना वाटले की, "आज जर लक्ष्मीकांत असते तर अशोक मामा एकटे नसते,"

.

To be continued,
























_whosunilmali

Comments